वाचक लिहितात   

टॅटू काढणे त्वचेसाठी घातक? 
 
शरीरावर टॅटू काढून घेण्याचे वेड विदेशी लोकांप्रमाणे आपल्या देशी समाजातील गरीब, श्रीमंत लोकांना लागले आहे. रंगीबेरंगी टॅटूज शरीराच्या उघड्या राहणार्‍या म्हणजेच हात, मान, पाय, पाठ अशा जागी काढले जातात की त्याकडे माणसे पहातच राहतात; परंतु हेच टॅटू काढण्यासाठी जी शाई आणि सुई वापरली जाते ती त्वचेसाठी घातक ठरू शकते. टॅटूसाठी वापरल्या जाणार्‍या शाईमध्ये कॉपर, काच, अल्कोहोल, बेरियम, कॅडमियम, निकेल, व्हेजिटेबल डाय आणि प्लास्टिक यांचे मिश्रण असते. टॅटू काढण्यासाठी जी शाई आणि सुई वापरली जाते त्यामुळे कर्करोग होण्याची भीती अमेरिकेतील संशोधनात वर्तविण्यात आली आहे. त्यावरुन भारतात कर्नाटक सरकारने टॅटू पार्लरवर काही निर्बंध लादण्याकरिता पुढाकार घेतला आहे. कर्नाटक सरकारने केंद्र सरकारला टॅटूसंदर्भात देशव्यापी नियमावली तयार करण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारने देखील गंभीरता दाखवून तज्ज्ञांच्या मदतीने निष्कर्षावर यावे. यामुळे खासकरुन युवकांना टॅटू काढण्यात जे काही धोके असतील ते समजून येतील.
 
राजन पांजरी, जोगेश्वरी, मुंबई.
 
पाणी वाटपाचे नियोजन करा
 
मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागल्या आहेत. सर्वत्र पाणी टंचाई जाणवू लागली आहे. नदी, नाले, तलाव, विहीर यांनी तळ गाठला आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्य आ वासून उभे आहे. तेव्हा नदी, नाले, तलाव खोदून त्यातील गाळ काढून ते स्वच्छ करावेत म्हणजे त्यातील झरे मोकळे होतील. त्यासाठी ग्रामस्थांनी श्रमदान करावे. त्यासोबतच पाणी फाऊंडेशन, नाम फाऊंडेशन यांसारख्या सामाजिक संस्थांची मदत घ्यावी. सरकारी पातळीवर देखील प्रशासनाने आतापासूनच पाणी वाटपाचे योग्य असे नियोजन करावे. प्रत्येक गावातील जल साठ्याची पाहणी करुन कोणत्या गावात किती दिवस पाणी पुरेल याचा आराखडा तयार करुन टँकर वाटपाचे वेळापत्रक तयार करावे. 
 
श्याम ठाणेदार, दौंड जि. पुणे
 
जबाबदारी चालकांचीच
 
वरळी येथे परिवहन आयुक्त कार्यालय, परिवहन भवन या इमारतीचे भूमिपूजन, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळेस फडणवीस म्हणाले की, भविष्यात रस्ते सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देऊन, सर्वसामान्य जनतेला, वाहन चालवण्याबाबत शिक्षित करण्याचे मोठे आव्हान परिवहन विभागाने स्वीकारणे आवश्यक आहे. यावर हसावे की रडावे ते समजेना! रस्ते सुरक्षा ही जबाबदारी केवळ वाहन चालकांचीच नाही, तर याला इतर अनेक घटकदेखील जबाबदार आहेत. उदा: रस्त्यांची कामे ज्यांच्या अखत्यारीत येतात ती महानगरपालिका तसेच एमएमआरडीए. त्यांनी रस्त्यावर खड्डे अथवा भेगा पडलेल्या असतील, तर ते बुजवणे हे त्यांचे काम आहे. आता राहिला प्रश्न तो सर्वसामान्य जनतेला वाहन चालवण्याबाबत प्रशिक्षण देण्याचा, तर या बाबतीत असे सांगावेसे वाटते की, परिवहन आयुक्तांनी कितीही समाजप्रबोधन केले तरी, वाहनचालक या कानांनी ऐकतात व त्या कानांनी सोडून देतात. वाहनचालक वाहतुकीचे नियम पायदळी तुडवताना दिसतात. जसे लाल दिवा असताना, सिग्नल तोडून पुढे जाणे, रस्त्यावर वाहन बेदरकारपणे चालवणे, आपली रांग सोडून विरुद्ध दिशेच्या रांगेत घुसणे, मद्यप्राशन करून वाहन चालवणे इत्यादी अनेक कारणांमुळे अपघात घडत असतात. तात्पर्य वाहनचालकांनी वाहने चालवताना, नियमांच्या चौकटीत राहून वाहन चालवल्यास, त्यांचे आणि रस्त्यावरून चालणार्‍या पादचार्‍यांचे भले आहे.
 
गुरुनाथ वसंत मराठे, मुंबई
 
तर सर्वसामान्यांकडून काय अपेक्षा करणार?
 
उत्तर प्रदेश विधानसभेत एका आमदाराने पान मसाला खाऊन चक्क सभागृहातच पिचकारी मारली. विधानसभेच्या अध्यक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पिचकारी मारणार्‍या बेजबाबदार आणि बेशिस्त आमदाराची चांगलीच कानउघडणी केली. खरेतर असा विधानसभेच्या सभागृहात थुंकणारा एखादा लोकप्रतिनिधीच नव्हे, तर तंबाखू चघळून, पान मसाला खाऊन जागोजागी पिचकार्‍या मारणार्‍या लोकांची आपल्या देशात कमी नाही. सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍या लाखो नागरिकांवर ठिकठिकाणच्या स्थानिक प्रशासनाने कारवाई करून कोट्यवधींचा दंड वसूल केल्याच्या बातम्या नेहमीच वाचनात येतात; परंतु कोट्यवधींचा दंड वसूल करूनही लोक सुधरत नाहीत आणि रस्त्यावर थुंकण्याचे थांबवत नाही, हेच खरे आपले दुर्दैव आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याने जंतुसंसर्ग होतो आणि त्यातून रोगराई पसरू शकते. क्षयरोग, न्यूमोनिया, श्वसनाचे आजार, पचन संस्थेचे आजार होऊ शकतात. सार्वजनिक स्वच्छतेचा बोजवारा उडतो; परंतु एखादा लोकप्रतिनिधीच जर पिचकारी मारत असेल आणि तीही चक्क विधानसभेच्या सभागृहात तर सर्वसामान्य तंबाखू ‘पिचकारीधारी’ लोकांकडून काय अपेक्षा करणार?
 
प्रदीप मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई

Related Articles