पाकिस्तान क्रिकेट संघ म्हणजे आयसीयूमधील रुग्ण : शाहिद आफ्रिदी   

कराची : पाकिस्तान क्रिकेट संघाची अवस्था सध्या बिकट झालेली पाहायला मिळत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत लाजीरवाणा पराभव स्वीकारुन बाहेर पडावे लागल्यानंतर संघात बरेच बदल पाहायला मिळत आहेत. चॅम्पियन्स चषकात पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पाकिस्तानच्या टी २० संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सलमान आगा याच्यावर सोपवण्यात आली. तर शादाब खानच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची धुरा टाकण्यात आली.आता १६ मार्चपासून पाकिस्तान आणि न्यूझीलंड दरम्यान टी २० मालिकेला सुरुवात होत आहे. या दरम्यान, शादाब खानचे संघामध्ये झालेले पुनरागमन आणि त्याला उपकर्णधार बनवण्यात आल्यानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याने संताप व्यक्त केला. 
 
शादाब खानची उपकर्णधारपदी नियुक्ती झाल्यानंतर आणि सलमान आगाकडे कर्णधारपद सोपवण्यात आल्यानंतर शाहिद आफ्रिदीने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. चुकीच्या निर्णयांमुळे पाकिस्तान क्रिकेटची अवस्था एखाद्या आयसीयूमधील रुग्णासारखी झाली आहे, असे म्हणत शाहिद आफ्रिदीने राग व्यक्त केला.
 हाती आलेल्या वृत्तानुसार, आफ्रिदी म्हणाला आम्ही नेहमी तयारीबद्दल बोलतो, परंतु जेव्हा एखादा मोठा इव्हेंट येतो, तेव्हा आपण फ्लॉप ठरतो. 
 
आपण पाकिस्तान क्रिकेटला सुधारण्याबद्दल बोलू लागतो. सत्य हे आहे की चुकीच्या निर्णयांमुळे पाकिस्तान क्रिकेटची अवस्था आयसीयूमधील रुग्णासारखी झाली आहे. आफ्रिदीने कठोर शब्दात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची खिल्ली उडवली आहे.  पीसीबीमध्ये जेव्हा जेव्हा नवीन अध्यक्ष येतो तेव्हा तो सर्वकाही बदलतो, असे आफ्रदी यावेळी बोलताना म्हणाला. 
 
प्रशिक्षक अनेकदा आपली नोकरी वाचवण्यासाठी खेळाडूंना दोष देतात.दुसरीकडे, व्यवस्थापन आपल्या जागा वाचवण्यासाठी प्रशिक्षक आणि खेळाडूंना लक्ष्य करते, असंही पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि यष्टपैलू खेळाडू शाहिदी आफ्रिदी याने म्हटले.
 
पुढे बोलताना तो म्हणाला, अशा परिस्थितीत पाकिस्तानमध्ये क्रिकेटची प्रगती होऊ शकत नाही. कारण कर्णधार आणि प्रशिक्षकांच्या डोक्यावर नेहमीच टांगती तलवार असते. शाहिद आफ्रिदीने टी-२० संघाचा नवा कर्णधार सलमान आगा याचा खरपूस समाचार घेत म्हटले की, ज्या खेळाडूचा टी-२०मध्ये स्ट्राइक रेट ७९ आहे तो संघाचे नेतृत्व करेल का?
 

Related Articles