भ्रष्टाचारात वाढ (अग्रलेख)   

भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड होऊनही शिक्षा झाल्याची उदाहरणे क्वचितच दिसतात. भ्रष्टाचार्‍यांना कायद्याचा धाक नसण्यातूनही भ्रष्टाचार वाढत असल्याचे समोर येते.
 
ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल ही संस्था दरवर्षी १८० देशांचा भ्रष्टाचारविषयक आलेख निर्देशित करणारा अहवाल प्रसिद्ध करते. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या या संस्थेच्या अहवालानुसार २०२४ मध्ये भारतातील भ्रष्टाचार वाढला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. २०२३ मध्ये भारत १८० देशांत ९३ व्या स्थानावर होता. तो घसरून २०२४ मध्ये भारत ९६ व्या स्थानावर गेला आहे. निर्देशांक निश्चित करण्याची ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलचे तज्ज्ञ प्रत्येक देशातील सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे मूल्यांकन करतात. भ्रष्टाचाराच्या व्याप्तीनुसार गुण दिले जातात. अहवालानुसार आपला शेजारी देश चीन ७६ व्या स्थानावर आहे. त्याच्या क्रमवारीत गेल्या दोन वर्षांत कोणताही बदल झाला नाही. पाकिस्तानातही भ्रष्टाचार वाढला असून, तो १३३ व्या स्थानावरून १३५ व्या स्थानावर पोहोचला आहे. या क्रमवारीत श्रीलंका १२१ व्या, तर बांगलादेश १४९ व्या स्थानावर आहे. जितके स्थान कमी तितका भ्रष्टाचार कमी असे हा अहवाल निर्देशित करतो. प्रथम क्रमांकावर असलेल्या डेन्मार्कमध्ये सर्वांत कमी भ्रष्टाचार आढळतो. फिनलंड आणि सिंगापूर हे द्वितीय आणि तृतीय क्रमांकावरील देश आहेत. भ्रष्टाचार मुक्त देशाचे स्वप्न पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना दाखवले. न खाऊंगा, न खाने दूंगा ही त्यांची पंतप्रधानपदावर आल्यानंतरची लोकप्रिय घोषणा होती; पण मोदींच्या दहा-बारा वर्षांच्या कार्यकाळातही भ्रष्टाचार कमी झालेला नाही. त्या आधी सत्तेवर असलेल्या ‘यूपीए’च्या कार्यकाळाशी तुलना केली, तर भ्रष्टाचाराच्या स्थितीत कोणतीही लक्षणीय सुधारणा झाल्याचे दिसत नाही. सार्वजनिक क्षेत्रात, सरकारी कार्यालयात होत असलेल्या भ्रष्टाचाराचा अनुभव पदोपदी येत असतो. कोणतीही कामे संबंधित सरकारी अधिकार्‍याला चिरीमिरी दिल्याशिवाय मार्गी लागत नाहीत. हा सर्वसामान्यांना येणारा नित्याचा अनुभव आहे. राजकीय नेत्यांकडून त्याकडे होणारा काणाडोळा आणि दुर्लक्ष हेच भ्रष्टाचार वाढण्यामागील कारण आहे.
 
भ्रष्टाचार हाच शिष्टाचार
 
भ्रष्टाचार ही गंभीर सामाजिक समस्या आहे, तिचे मूळ प्रामुख्याने व्यक्तीच्या अनैतिक व्यवहारात आहे. नैतिक मूल्यांची होत असलेली घसरण किंवा र्‍हास हे भ्रष्टाचाराच्या प्रवृत्तीचे मुख्य कारण आहे. खोटेपणा, नियमबाह्य वर्तन आणि अपारदर्शकता या बाबी बर्‍याचदा अनैतिक वर्तनाला कारणीभूत ठरतात. सभोवतालची सामाजिक, राजकीय परिस्थितीही भ्रष्टाचार वाढण्यास साहाय्यभूत ठरत असते. व्यक्तिगत लाभासाठी स्वतःला मिळालेल्या अधिकाराचा गैरवापर करणे हा देखील एक प्रकारचा भ्रष्टाचारच ठरतो. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात सरकारी कर्मचार्‍यांकडून राज्यातील महसुलातून होणारा पैशांचा अपहार आणि तेथे होणार्‍या भ्रष्टाचाराच्या प्रकाराच्या नोंदी आढळतात. याचा अर्थ अनादी काळापासून भ्रष्टाचार सुरू आहे. अलीकडच्या काळात तर भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला आहे. पैसा खाणे, पैशाची अफरातफर करणे एवढ्या पुरताच भ्रष्टाचार सीमित नाही. आपली जबाबदारी नीटपणाने न पाळणे, अधिकाराचा स्वार्थासाठी वापर करणे, सत्तेचा गैरवापर, संपत्तीच्या हव्यासापोटी नियमांचे उल्लंघन हीदेखील भ्रष्टाचाराची उदाहरणे होत. सार्वजनिक जीवनात व्यावसायिक वृत्तीचा अभाव, हे देखील भ्रष्ष्टाचाराचे कारण आहे. अल्पावधीत श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी, विनाकष्टाचे उच्च दर्जाचे जीवन जगण्याची इच्छा माणसाला भ्रष्ट बनवण्यास प्रवृत्त करते. अकार्यक्षम नेतृत्व, निवडणुकांसाठी निधी, राजकीय हितसंबंध, राजकीय उदासीनता, नात्यागोत्याचे राजकारण यातून भ्रष्टाचारास खतपाणी मिळते. अमर्यादित कायदे, कायद्यातील कमकुवत बाजू आणि कायद्याच्या अंमलबजावणीतील ढिसाळपणा यांचा गैरफायदा घेतला जातो. भ्रष्टाचार दूर होण्यासाठी केवळ कायदे पुरेसे नसून त्यासाठी सामाजिक नीतिमूल्यांची जाण वाढण्याची खरी गरज आहे. सुसंस्कृत, सभ्य आणि भ्रष्टाचारमुक्त समाज निर्माण करण्यासाठी कृती कार्यक्रमाची आखणी आणि विषमताविरहित समाजाची निर्मिती करावी लागेल. ‘लाच देणार नाही, लाच घेणार नाही’, ही प्रतिज्ञा सर्वांनी कसोशीने पाळली, तरच भ्रष्टाचारमुक्त समाजाच्या दिशेने वाटचाल शक्य होईल.

Related Articles